मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय   

वाहतूक कोंडी; नागरिकांचे हाल 

पुणे : दुपारी आलेल्या मुसळधार पावसाने रात्री आठ वाजल्यानंतर पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावले. यावेळी मात्र पावसाचा जोर अधिक होता. शहरातील सर्वच रस्त्यांना नाल्याचे स्वरुप आले होते. विशेष म्हणजे पुणेकरांनी संध्याकाळी घराचा रस्ता धरल्यानंतर मुसळधार पावसाने गाठले. त्यामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. शहरातील सर्वच रस्त्यांवर पाणीच पाणी होते.
 
शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणार्‍या अंबिल ओढाची पातळी काल झालेला पावसामुळे पुन्हा वाढली होती. महापालिका प्रशासनाला शहरातील ९ ठिकाणी पाणी साचल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यामध्ये गुंजन चौक, सुखसागर बिबवेवाडी, कात्रज चौक, वारजे सेवा रस्ता, गांधी भवन, कोथरुड महामार्ग रस्ता, सुतारवाडी, आंबेगाव या भागात पाणी साचल्यामुळे
 
महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला याची माहिती मिळाल्यानंतर पाण्याचा निचार करण्यात आला.
सिंहगड रस्त्यावर धायरी परिसरात सुध्दा अनेक भागात पाणी साचले होते. रस्त्यावर १ ते २ फुटांपर्यंत पाणी साचल्याने नागरिकांना धडकी भरली. याच भागातील ब्रम्हा हॉटेलमध्ये सुध्दा पाणी शिरले. कात्रजमधील राजीव गांधी उद्यान ते कात्रज चौकापर्यंत रस्त्याला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. कात्रज- कोंढवा रस्त्यावरील माऊलीनगर येथील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले. कोंढव्यात जेके पार्क याठिकाणी रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी वाहून गेल्या आहेत. टिंगरेनगरमधील संजय पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून याठिकाणी कामे सुरु करण्यात आले. शहरातील सर्वच नाल्यानां पाणी वाढल्यामुळे पुणेकरांचा जीव टांगलीला लागला होता. आनंदनगर हिंगणेमध्ये रस्त्यावर अनेक मोटारी पावसामुळे बंद पडल्या. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. काही महिन्यांपुर्वी सुरु करण्यात आलेल्या लोहगाव विमानतळावरील टर्मिनलला सुध्दा पावसाचा फटका बसला आहे.
 
शहराच्या उपनगर भागातील आंबेगाव पठार परिसरात  जोरदार पाऊस बरसला. आंबेगाव बुद्रकमध्येही प्रचंड पाऊस झाला. या भागातील सर्वच रस्त्यांवर पाणीच पाणी साचले होते. निलगिरी चौक, जिजामाता चौक ते चिंतामणी ज्ञानपीठ रस्त्यावर गुडघ्याभर    पाणी साचल्याने वाहन चालकांची मोठी तारांबळ उडाली. या मार्गावरून पादचारी नागरिकांना चालणे देखील मुश्किल झाले होते. चिंतामणी शाळेजवळ पावसामुळे भाजीपाला पाण्यात वाहून गेल्याने काही पथारी व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. पावसामुळे रस्त्यावरून जाणार्‍या महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचे मोठे हाल झाले. कात्रज-आंबेगाव भागात सर्वाधिक ६२ मि.मी. पाऊस झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली. 
 
महापालिकेचे कर्मचारी रस्त्यावर
 
शहरात मुसळधार पावसामुळे हाहाकार उडला. महापालिकेने पावसाच्या पार्श्वभूमीवर क्षेत्रिय कार्यालय निहाय पथके तयार करण्यात आली. यासर्व पथकाना रस्त्यावर उतरावे लागले. रात्री उशिरापर्यंत महापालिकेचे कर्मचारी रस्त्यावर पाण्याचा निचरा करण्यासाठी कार्यरत होते. महापालिका कर्मचार्‍यांना अनेक भागात रात्रभर काम केल्यामुळे रस्त्यावरील पाण्याचा निचरा झाला.
 
पहिल्याच पावसात पालिकेची पोलखोल
 
महापालिकेने पावसाळ्यापुर्वीची कामे पुर्ण केली असल्याचा दावा केला होता. मात्र, शहरातील सर्व भागात पाणी साचल्यामुळे महापालिकेची पोलखोल झाली आहे. रस्त्यांवरुन पाण्याचा निचराच होत नसल्यामुळे महापालिकेचे पितळ उघडे पडले आहे. पावसाळ्यापुर्वी नाले आणि पावसाळी वाहिन्यांची साफसफाई करण्याचा दावा करणार्‍या महापालिका प्रशासन पुन्हा एकदा साफ खोटे ठरले आहे.
 
पेठांपमध्ये पाणीच पाणी
 
शहरातील मध्यवर्ती भागातील शिवाजी नगर, डेक्कन, सदाशिव पेठ, नारायण पेठ, बुधवार पेठ, रविवार पेठ, शुक्रवार पेठ यासह अन्य पेठातही जोरदार पाऊस झाला. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. जंगली महाराज रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे अनेक दुचाकी वाहने बंद पडल्याने अनेक ठिकाणी वाहनांची कोंडी झाल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. काही ठिकाणी वाहने पाण्यात दुचाकी वाहने अडकल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. महापालिकेने नाले सफाई व पावसाळी गटरांचे स्वच्छतेचे कामे पूर्ण होत आले आहे, असा दावा केलेला असताना पावसामुळे कामाचा फज्जा उडाला. तर शहराच्या अनेक भागात चौकाचौकात, रस्त्यावर पाणी तुंबल्याचे प्रकार समोर आले आहे. त्यामुळे पावसाळ्यापुर्वीच आपत्ती व्यवस्थापनाची तारेवरची कसरत सुरु झाली आहे.
 
कात्रज भागात रस्ते पाण्याखाली
 
सलग दुसर्‍या दिवशीही (मंगळवारी) कात्रज भागात मुसळधार पाऊस झाला. दुपारी साडे तीनच्या सुमारास वादळी वार्‍यासह पावसाला सुरूवात झाली. दोन ते अडीच तास पाऊस सुरूच होता. पावसामुळे वाहन चालक व नागरिकांची तारांबळ उडाली. बहुतांश रस्त्यांवर पाणीच पाणी साचले होते. कात्रज-कोंढवा पुलावरही पाणी साचले. राजीव गांधी प्राणी संग्राहलय समोरील पदपथावर गुडघ्याभर पाणी साचले होते. या भागातील सर्वच छोटे-मोठे रस्ते जलमय झाले होते. मांगळेवाडी व जांभुळवाडी भागातील काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळाची स्थिती पाहवयास मिळाली. यामध्ये अनेकांचे संसारपयोगी वस्तुंचे मोठे नुकसान झाले. यासह गुजरवाडी, निंबाळकरवाडी आणि भिलारवाडी भागात रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्याने नागरिकांना मार्ग काढणेही कठीण झाले होते. 
 
मान्सून रविवारपर्यंत केरळात  
 
नैऋत्य मोसमी पावसाची (मान्सून) पुढील वाटचाल वेगाने सुरू आहे. अंदमान, बंगालचा उपसागर, अरबी समुद्र, कोमोरीन क्षेत्रात मान्सूनने प्रगती केली आहे. येत्या रविवारपर्यंत मान्सून देवभूमी केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण कायम आहे. त्यामुळे याआधी हवामान विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार मान्सूनची वाटचाल सुरू असल्याने महाराष्ट्रातही मान्सून वेळेआधीच दाखल होणार असल्याचे संकेत कायम आहेत.
 
सिंहगड रस्ता परिसर जलमय
 
सिंहगड रस्त्यावरील धायरी, हिंगणे, विठ्ठलवाडी आणि  संतोष हॉल परिसरात पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे सिंहगड रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. रस्ता जलमय झाला होता. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहने बंद पडली. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. महापालिका प्रशासनाला याभागातून अनेक तक्रारी मिळाल्या. यानंतर प्रशासनाकडून पाण्याचा निचारा करण्यासाठी काम सुरु करण्यात आले होते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या सिंहगड रस्त्यावरील पुलावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे तासभर नागरिक अडकून पडले होते.
 
पुणे, चिंचवडवर पावसाचे ढग 
 
शहर आणि परिसरात मागील दोन दिवसांपासून पावसाचा ऑरेंल अलर्ट देण्यात आला आहे. काल दुपारी ३.३० वाजल्यापासून शहरात मेघगर्जना व वीजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस पडला. सुमारे रात्री ९.३० वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. त्यामुळे मध्य वस्तीसह उपनगरातील बहुतांश रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले होते. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहरावर पावसाचे ढग साचले होते. त्यामुळे एकाच भागात खुप वेळ अधिक पाऊस पडला असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.
 
प्रवाशांची मोठी तारंबळ 
 
विश्रांतवाडी : पूर्व भागात सलग दुसर्‍या दिवशी ही मुसळधार पावस पडत आहे. पुणे विमानतळावरील एक्झिट गेटवर पाण्याचे तळे साचले. त्यामुळे प्रवाशांना पाण्यातूनच वाट काढत यावे लागले. मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. प्रवाशांची मोठी तारंबळ झाली. या भागातील  विश्रांतवाडी, धानोरी, वडगावशेरीतील अनेक सोसायटीत शिरलेले चित्र समोर आले आहे. नागरिकांचे मोठे हाल झाले असून प्रशासनाचे भोंगळ कारभार पुन्हा उघडीस आला आहे.
 
मान्सून पूर्व पावसाने राज्यभरात धुमाकूळ घातला  आहे. पुढील पाच दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय, मान्सून पावस मे महिन्यातच पडणार्‍या अवकाळी पावसामुळे नागरिकांची दैना उडलेले चित्र दिसत आहे. 
 
पद्मावतीनगरमध्ये जमीन खचली
 
धनकवडीतील पद्मावती नगर सोसायटीच्या सिमाभिंती लगत असणारा भाग पावसामुळे कोसळला. येथील पत्राच्या एका घरावर ही माती आणि दगड आले. या घरात अडकलेल्या दोन नागरिकांना अग्निशमन दलाकडून सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. अग्निशमन दल आणि महापालिका प्रशासनाकडून संबंधित इमारत परिसराची पाहणी करण्यात येत आहे.
 
सणसवाडी, धानोरीत फलक कोसळले
 
सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे शहर आणि परिसरात दोन ठिकाणी फलक कोसळले. पुणे-अहिल्यानगर महामार्गावर सणसवाडी येथे रस्त्याच्या लगत असलेले फलक कोसळले. त्यामुळे सात ते आठ दुचाकींचे नुकसान झाले. सुदैवाने, यात कोणती जखमी झाले नाही. धानोरी पोरवाल रस्ता याठिकाणी सुध्दा एक फलक कोसळले. 
 
मे महिन्यातील शिवाजीनगरमधील पाऊस 
 
वर्ष पाऊस
२०१५ १०२.८ मि.मी 
१९६२ ६०.५ मि.मी. 
१९५७ ५५.६ मि.मी. 
१९६१ ४७.८ मि.मी.
 
३० ठिकाणी झाडे कोसळली
 
पावसाच्या सरीबरोबरच सोसाट्याच्या वारा वाहत होता. कोरेगाव पार्क, येरवडा, धानोरी, टिंगरेनगर, एरंडवणा, देवाची ऊरळी परिसरात ३० ठिकाणी झाडे कोसळली. सुदैवाने, यात कोणीही जखमी झाले नाही. महापालिका आणि अग्निशमन दलाकडून तात्कळ रस्त्यावरील झाडे काढण्यात आली.
 
कोथरूडमध्ये हॉटेल आणि सोसायट्यांमध्ये शिरले पाणी 
 
अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे कोथरूड आणि वारजे परिसरातील नागरिकांची तारांबळ उडाली. अवघ्या २ तासात तब्बल ६१ मिलीमीटर पाऊस पडल्यामुळे रस्त्यावर भयानक पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे लोकांना रस्त्यावर चालता येत नव्हते. तसेच अनेक सोसायटीच्या पार्किंगमध्ये देखील पाणी शिरले होते. त्यामुळे लोकांच्या गाड्यांचे मोठे नुकसान झाले. तर हॉटेलमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. वाहतूक ठप्प झाल्यामुळे आणि गाड्या बंद पडल्यामुळे अनेक नागरिक रस्त्यात अडकून पडले. 

Related Articles